शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडने तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू- अमोल शिंदे

शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडने तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू- अमोल शिंदे

पाचोरा-
येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महावितरण कार्यालयात जाऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची ऐन रब्बी हंगामात सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी या संदर्भात निवेदन देऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की जिल्ह्यासह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात खरीप हंगामात पिके शेवटच्या टप्प्यात असताना उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरात येण्याच्या वेळी (म्हणजेच कापूस पिकात बोंड परिपक्व होत असतांना आणि ज्वारी मका पिकाचे कणीस भरत असताना) झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अशा बिकट परिस्थितीत या सरकारने बाधित क्षेत्र जिरायती/बागायती/बहुवार्षिक अश्या सर्व शेतकऱ्यांना वेगवेगळी मदत घोषित करून तशी नदेता सरसकट १०,००० प्रति हेक्टर याप्रमाणे तुटपुंज्या स्वरूपाची मदत दिली.या दुष्काळी मदतीत शेतकऱ्यांचा एकरी लागणारा मशागतीचा,बी-बियाणे व रासायनिक खतांचा आणि मजुरीचा देखील खर्च निघाला नाही.अशा पद्धतीची दुष्काळी मदत करून ह्या असंवेदनशील ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली.
परंतु आता शेतकरी बांधव आधीच्या संकटातून सावरत नाही तोपर्यंत रब्बी हंगामाची सुरुवात झाली असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांमध्ये मका,गहू,हरभरा,सोयाबीन,
बाजरी या पिकांची लागवड केलेली आहे. काही शेतकरी लागवडीसाठी शेतीला पाणी देऊन क्षेत्र लागवडीयोग्य करीत आहेत.या काळात शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असताना हे अकार्यक्षम ठाकरे सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीचे वीज बिल वसुली करून वीज बिल न भरल्यास कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा जुलमी प्रकार सबंध पाचोरा आणि भडगाव तालुक्यात करीत आहे. असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
तसेच त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर देखील घणाघाती टीका करत म्हणाले की आमदार अजून झोपेत असून त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या का दिसत नाहीत.गेल्या काही दिवसांपासून रोज शेतकरी भाजपा कार्यलयात येतात व समस्या मांडतात फोनवर संपर्क करून समस्या मांडतात मात्र आमदार महोदयांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का ? असा सवाल करत शेतकऱ्यांचे विहिरीत पाणी असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत असल्याची जहरी टीका यावेळी शिंदे यांनी आमदारांवर करत महावितरणाचे कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांना निवेदन देऊन सदर सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडणे न थांबल्यास रस्त्यावर उतरून भारतीय जनता पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा दिला याप्रसंगी उपस्थित पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड,भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस संजय पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.