कासार पिंपळगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती, एसटी बस चालक दिलिप राजळे यांचा सेवा निवृत्ती बद्दल सन्मान सोहळा आणि गावची ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती, एसटी बस चालक दिलिप दशरथ राजळे यांचा सेवा निवृत्ती बद्दल सन्मान सोहळा आणि कासार पिंपळगावची ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.संपुर्ण देशभरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे माजी सरपंच मोनालीताई राजळे, सेवानिवृत्त एसटी बस चालक दिलिप राजळे, पत्रकार सुनिल नजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.एसटी महा मंडळाच्या पाथर्डी आगाराचे चालक दिलिप दशरथ राजळे हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत त्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर प्रशासक मोनालीताई राजळे यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामसभेने आयोजन करण्यात आले होते.गावातील अनेक नागरीकांनी आपले प्रश्न उपस्थित केले. कचरा कुंड्या, स्मशान भूमी वरील खर्च,खराब रस्ते,गावात वारंवार विस्कळीत होणारा सार्वजनिक पिण्याचा पाणीपुरवठा, विजेचा लपंडाव,तसेच ग्रामपंचायतीने केलेला विविध विकास कामा वरील खर्च अशा अनेक बाबी वर प्रकाश झोत टाकण्यात आला. लोकशाही मध्ये पारदर्शक कारभारासाठी सार्वजनिक हिताचे प्रश्न विचारणे हा नागरीकांचा मुलभूत अधिकार आहे.त्या प्रमाणे नागरीकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.या ग्रामसभेत लोकशाही मुल्यांची जोपासना झाल्याचे दिसून आले.ग्रामसभा म्हटली की सवाल जवाब हे होतातच, नागरीकां कडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असते.गावातील एका सुज्ञ नागरिकांनी सांगितले की मी लहान पणापासून अनेक वेळा गावात दारुबंदी साठी अनेक ठरावा द्वारे प्रयत्न केले गेले.आम्ही दारू प्यायचे शिकलो पण गावात आज पर्यंत दारूबंदी झालीच नाही असे सांगताच सभेत एकच हास्यांचा कल्लोळ उठला.दारूबंदी आणि मटका बंदी साठी थेट जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) ला पत्र देण्याचे सुचवण्यात आले.एका नागरीकांने गावातील अंगणवाडी एका वस्तीत अंगणवाडीला नाव मात्र दुसऱ्याच वस्तीचे आहे ते नाव बदलण्याची मागणी केली.गावातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी उपलब्ध नाहीत त्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्याचे सुचवण्यात आले.सुरूवातीस कोरम अभावी तहकूब होण्याच्या मार्गावर होती परंतु नंतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने ग्रामसभेत कधी नव्हे एवढे प्रश्न विचारले गेले.ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत गावाने पंधरा लाख रुपयांचे तालुक्यातील पहीले बक्षीस मिळवण्या साठी जे प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांचे विषेशतः युवा वर्गाचे आभार मानले.प्रशासक मोनाली ताई राजळे यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना सांगितले की गावात राजकारण जरूर करा परंतु ते निवडणुका आल्या वर करा.आता विकास कामात सर्वांना सोबत घेऊन मी काम करत आहे. गावातील विकास कामे करताना माझ्या कडून काही चुकले असेल,काही जण दुखावले गेले असतील,काही घटकांना न्याय मिळवून देता आला नसेल तर त्यांनी मोठ्या मनाने मला माफ करावे.पण आता विकास कामांत खांद्याला खांदा लावून काम करावे.विकास कामासाठी गावाला बक्षीस मिळाले तर ते मला मिळणार नाही त्यात गावाचा सन्मान आहे.गावाचे नाव मोठे होणार आहे फक्त निमित्त मात्र मी असेल.आता दोन जून रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत पाहणी करून जिल्हा स्तरावर बक्षीस मिळवण्या साठी सांगली जिल्ह्यातील कमेटी गावात येणार आहे.गावातील सर्व सामान्य घटकांनी मिळून त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. गावातील सर्व सरकारी कार्यालये उजळून निघाली पाहिजेत.प्रत्येक महीलांनी आपल्या घरा दारात रांगोळी,सडा समार्जन करून आपला परीसर स्वच्छ ठेवावा.शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक मंदिरे,सरकारी दवाखाना,पशु उपचार केंद्र, वाचनालय, परसबाग, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशान भूमी, खाजगी व सरकारी रस्ते, शेतरस्ते,स्वस्त धान्य दुकान, तलाठी कार्यालय, सोसायटी परीसर,पोस्ट ऑफिस,सरकारी कार्यालये यांनी आपला परीसर स्वच्छ ठेवावा. गावातील आपले मतभेद विसरून कमेटीच्या स्वागतासाठी सर्व ग्रामस्थांनी सज्ज झाले पाहिजे.असे आवाहन प्रशासक मोनालीताई राजळे यांनी केले आहे. या ग्रामसभेत युवा नेते संदिप राजळे, गोरक्षनाथ राजळे सर,दिलिप राजळे सर, भा.पा.राजळे, गणेश भगत, प्रमोद तिजोरे, नवनाथ तिजोरे, अंकुश जगताप, विजय राजळे, उत्तम राजळे,अमोल म्हस्के यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.दत्तात्रय शेळके सर यांनी तर मी जनगणना करण्यासाठी गेलो असता भिल्ल समाज वस्तीला पिण्याचे पाणी मिळेना तेथे काही तरी व्यवस्था करा असा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. गावात भिल्ल वस्तीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याचे दिसून आले.एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न झाली.गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























