‘महाविद्यालयीन नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम-डॉ.सुनिल कुलकर्णी

‘महाविद्यालयीन नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम-डॉ.सुनिल कुलकर्णी

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०४ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘विद्यापीठस्तरीय एकदिवसीय नियतकालिक अंक संपादक मंडळाची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते कै.मा.ना.सौ.अक्कासो. शरच्चंद्रिका सुरेश पाटील, संस्थापक अध्यक्ष तसेच माजी आमदार कै.डॉ.दादासाहेब सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी त्याचबरोबर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ.आशुतोष पाटील, धरणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.के.एम. पाटील व कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच परिचय विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शैलेशकुमार वाघ यांनी करून दिला. यावेळी प्रास्तविक करतांना ते म्हणाले की, नियतकालिकाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी तसेच नियतकालिक अंक संपादक मंडळाचे प्रबोधन व्हावे हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश आहे.’
या कार्यशाळेत विद्यापीठ परिक्षेत्रातील जवळपास ६० हून अधिक संपादक मंडळ सदस्य सहभागी झाले होते. याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी म्हणाले की, ‘ विद्यार्थ्यांना लेखनासाठी व आपले विचार व्यक्त करण्यासाठी संधी मिळावी यासाठी नियतकालिक हे अभिव्यक्तीचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे.नियतकालिक अस्मितेचे प्रतीक असून त्यात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची अभिव्यक्ती व्हायला हवी’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.सौ.पी.एम.रावतोळे यांनी केले तर आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डी.डी.कर्दपवार यांनी मानले.
या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. आशुतोष पाटील यांनी ‘महाविद्यालयातील उत्कृष्ट उपक्रमांचा समावेश नियतकालिकामध्ये असावा. महाविद्यालय ज्या भागात कार्य करीत आहे त्या भागाचे प्रतिबिंब नियतकालिकात पडायला पाहिजे. सोशल मीडियावर विद्यार्थी लिहितात याचा अंतर्भाव नियतकालिकात व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करायला हवे. आजच्या युगाचे स्वरूप नियतकालिकाला येण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला, त्याच्या कल्पकता व सर्जनशीलतेला वाव देणारा नियतकालिक अंक असायला पाहिजे’.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रभारी प्राचार्य डॉ.के.एम.पाटील म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव द्यावा. नियतकालिक संपादन करतांना लेखनाचे नियम माहिती हवेत. लेखन साहित्य संकलनासाठी विद्यार्थ्यांना लिहिते करावे.मुळातच विद्यार्थी घडविणे व त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे हा नियतकालिकाचा उद्देश असतो’.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन.सोनवणे ‘नियतकालिकाची मांडणी’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘अचूक मांडणीमुळे नियतकालिक उत्कृष्ट बनते. नियतकालिक महाविद्यालय व विद्यार्थ्यांच्या सृजशीलतेचा उत्तम आविष्कार असतो.संपादन करतांना शुद्धलेखनातील चुका टाळल्यास संपादन करणे सुकर होईल’.
या नियतकालिक अंक संपादक मंडळ कार्यशाळेच्या समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते तसेच प्रभारी प्राचार्य डॉ.के.एम.पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ.के.एन.सोनवणे, एम.जी.पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अभ्यास मंडळावर निवड झालेले सदस्य डॉ.जयंत लेकुरवाळे, डॉ. प्रतिभा सूर्यवंशी, डॉ. हेमंत पाटील व डॉ. सुषमा सनेर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.जयेंद्र लेकुरवाळे व डॉ.प्रतिभा सूर्यवंशी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘या कार्यशाळेतून नियतकालिक मांडणी, शैली, लेखनाचे संकलन कसे करावे? याविषयी विचारमंथन झाले. यातून नियतकालिक संपादन करण्यात सुकरता येईल, यात शंका नाही’.
या समारोप सत्राचे सूत्रसंचलन डॉ.पी.एम. रावतोळे यांनी केले तर आभार डी.डी.कर्दपवार यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य सौ.एम.टी.शिंदे, डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ.एम.एल.भुसारे,डॉ.आर.आर.पाटील, एम.ए.पाटील, एम.बी.पाटील, ए. एच. साळुंखे, एस. जी.पाटील, बी.एच.देवरे, जी.बी.बडगुजर यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेप्रसंगी विविध महाविद्यालयातील संपादक मंडळ प्रमुख, सदस्य तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.