जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांच्या बळावर बाजार समितीची सत्ता पुन्हा हस्तगत करू -आमदार किशोर पाटील

जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांच्या बळावर बाजार समितीची सत्ता पुन्हा हस्तगत करू -आमदार किशोर पाटील

पाचोरा(वार्ताहर) दि,२९
राज्यातील सत्तांतरा नंतर प्रथमच पाचोरा भडगाव मतदारसंघात पाचोरा भडगाव बाजार समितीच्या निमित्ताने पहिली सार्वत्रिक निवडणूक होत असून
या निवडणुकीत आपल्यावर जनतेचा असलेला विश्वास तसेच कार्यकर्त्यांच्या बळावर आपण पुन्हा सत्ता हस्तगत करून बाजार समितीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केले आहे.खेडगाव ता.पाचोरा येथील किशोर अप्पा पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दुपारी १ वाजता झालेल्या नवीन पदाधिकारी निवड व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील,जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, माजी सभापती पंढरीनाथ पाटील, इंदल परदेशी, युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, अविनाश कुडे,चंद्रकांत धनवडे, शिवदास पाटील, वसंत पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ.पाटील म्हणाले की, बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असून विरोधकांची निवडणूक बिनविरोध करायची तयारी असल्यास आपण देखील मागे हटणार नाही असे सांगत गतकाळात बाजार समितीत तांत्रिक मुद्दे उकरून विरोधकांनी काही काळ सत्ता हस्तगत केली मात्र सत्ता काळात त्यांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देत मोक्याच्या जागा विक्रीची घाट घातला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.सहकारात आपण कधीही राजकारण करणार नाही त्यामुळे समविचारी मंडळींनी युती/ आघाडी साठी साद घातल्यास आपण शेतकरी हितासाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांची भाषणे झाली त्यांनी भाषणातून सतीश शिंदे यांच्या काळातील गैरव्यवहारावर टीका केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले तर आभार जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंह पाटील यांनी मानले.