पाचोऱ्यात लढवय्या भीमसैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न

पाचोऱ्यात लढवय्या भीमसैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न

सर्वांना विकासाची समान संधी देण्याचे काम राज्यघटनेने केले – माजी खासदार प्रा.जागेंद्र कवाडे


पाचोरा ता. २३ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी तसेच संविधानाच्या माध्यमातून देश प्रबळ व प्रभावी बनविण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आजच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेबांची विचारसरणीच देशाला व मानव जातीला तारणारी आहे, त्यांनी निर्माण केलेली राज्यघटना ही सर्वांना विकासाची समान संधी देणारी असल्याचे प्रतिपादन पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले, पाचोरा येथे आयोजित लढवय्या भीम सैनिकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी होते.
जनता वसाहतीतील बुद्धविहाराच्या प्रांगणात सन्मान सोहळा झाला. धम्मोदय बुद्ध बिहार विस्तारीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. याप्रसंगी प्रा. जोगेंद्र कवाडे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश सावंत (मुंबई), पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, जगन सोनवणे, राजू मोरे, कल्पेश
मोरे, मुकुंद बिल्दीकर, गणेश पाटील, संजय गोहिल, नारायण सपकाळे, शंकर सोनवणे, सरपंच सुनील पाटील, किशोर बारवकर, आनंद नवगिरे चंद्रकांत धनवडे, संजय जडे, प्रवीण ब्राह्मणे, भरत लोंढे, खलील देशमुख आदी उपस्थित होते. शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रतिमापूजनाने कार्यक्रम सुरू झाला. देविदास थोरात, सागर थोरात, वैष्णवी थोरात यांनी स्वागत गीत तर रवींद्र बाळदकर यांनी बुद्धवंदना गायन केले. याप्रसंगी आनंद नवगिरे, भरत लोंढे, खलील देशमुख, जयदीप कवाडे, सुरेश सावंत, आमदार किशोर पाटील यांची भाषणे झाली. त्यांनी गतकाळातील मविआ सरकारच्या कार्यप्रणाली व ध्येय धोरणांवर टीका केली. आपल्या तासाभराच्या अभ्यासपूर्ण मनोगतात प्रा. कवाडे यांनी मनुवादी व्यवस्था ही देशाची व मानव जातीची शत्रू असून ही व्यवस्था नष्ट होणे मानव जातीच्या कल्याणासाठी गरजेचे आहे. या व्यवस्थेविरुद्ध आपसात लढण्यापेक्षा या मनुवादी व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. शिंदे यांच्या माध्यमातून लोकाभिमुख सरकार सत्तेवर आले असून, त्यांची कामाची धडपड व गती पाहता भविष्यात अनेक प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बुद्ध विहारासाठी लाखो रुपयांचा निधी देऊन बुद्धविहाराचा विस्तार व सुशोभीकरण केल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांचा विविध आंबेडकरी संस्था संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्यावतीने प्रा. कवाडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मण ब्राह्मणे, आर पी बागूल, श्रावण ब्राह्मणे, आनंद नवगिरे, दीपक शेजवळ, विश्वनाथ भिवसने, भालचंद्र ब्राह्मणे, राजू लहासे, राजरत्न पानपाटील , सचिन नन्नवरे मिलिंद तायडे. राजेंद्र खचनि, आकाश थोरात, किरण अहिरे, विजय साळवे, विकास थोरात,सागर अहिरे आदींसह विविध आंबेडकरी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आबेडकरी चळवळीत पन्नास वर्षांपासून योगदान देऊन आंबेडकरी चळवळ प्रबळ व गतिमान करणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र, संविधान प्रत व बुके देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्या स्थळी येण्याअगोदर उपस्थित मान्यवरांची शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रवीण ब्राह्मणे व जय वाघ यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.