चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ विषयावरील एक दिवसीय सेमिनार संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ विषयावरील एक दिवसीय सेमिनार संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात इयत्ता बारावी व तृतीय वर्ष कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: संकल्पना व संभावना’ या विषयावरील एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व वक्ते धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर डॉ. एच.आर. तळले, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, उपप्राचार्य एस. पी. पाटील, पर्यवेक्षक ए.एन. बोरसे, समन्वयक पी. एस. पाडवी, सेमिनारचे समन्वयक डी. एस. पाटील व सेमिनारचे सह समन्वयक डॉ. एल. बी. पटले आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. एल. बी. पटले यांनी करून दिला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.एच.आर. तळले ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०: संकल्पना व संभावना’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘जगामध्ये भारताची शिक्षण व्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे परंतु आपल्या देशातील शिक्षण प्रणालीमध्ये सर्वत्र समानता यावी, विद्यार्थ्यांना विविध शाखांचे शिक्षण घेता यावे उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना अनुभवात्मक, चर्चात्मक, कौशल्यात्मक, व्यवसायात्मक आणि विश्लेषणात्मक शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होईल.त्यामुळे रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत होईल.या नवीन शैक्षणिक धोरणाचा परिचय करून देण्यासाठी महाविद्यालयातील प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसमज दूर करावेत आणि विद्यापीठाने विषयांच्या निवडीबाबत ठरवून दिलेल्या नियमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे’. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे पदवी पदव्युत्तर आणि पीएच.डी पर्यंतचे शिक्षण कशाप्रकारे घेता येईल.त्यांची रचना, कालावधी व अभ्यासक्रम क्रेडिट पद्धती कशी राहील, त्याचे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदे कसे होतील हे पीपीटीद्वारे सविस्तर समजावून सांगितले त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापकांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सेमिनारचे समन्वयक डी.एस.पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेमिनार आयोजन समिती सदस्य डॉ.व्ही.आर.कांबळे, डॉ.एम.एल. भुसारे, ए.आर.पाटील, पी.आर. पाटील, घनश्याम पटेल, व्ही.डी.शिंदे व डी.डी.करंकाळ यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता बारावी व तृतीय वर्ष कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.