जळगावकरांशी आमच्या कुटुंबाशी वेगळाच ऋणानुबंध – आमदार सत्यजीत तांबे
– जळगाव दौऱ्यादरम्यान व्यक्त केल्या भावना
– आ. तांबेंनी घेतल्या विविध संस्था व संघटनांच्या भेटी
प्रतिनिधी, जळगाव :
“जळगाव जिल्ह्याशी आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध हा फक्त राजकीय नसून, तो सामाजिक, वैचारिक आणि भावनिक आहे. इथल्या माणसांशी आमचं नातं कित्येक पिढ्यांपासून जपलेलं आहे. त्यामुळे येथे आलो की घरच्यांसारखी आपुलकी आणि आपलेपणाची भावना मिळते,” असे भावनिक शब्दांमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केल्या. नुकत्याच झालेल्या जळगाव दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला.
या दौऱ्यात आ. तांबे यांनी पारोळा, अमळनेर, चोपडा, जळगाव शहर तसेच काही ग्रामीण गावांमध्ये जाऊन शिक्षक, विद्यार्थी, उद्योजक आणि तरुणांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. विविध गटांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक पातळीवरील अडचणी, अपेक्षा, विकासाच्या संधी आणि प्रशासनासंदर्भातील समस्या समजून घेतल्या. दौऱ्यादरम्यान त्यांनी शैक्षणिक संस्था व विविध संघटनांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना, आपण मांडलेल्या सर्व समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु असून यासंदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावादेखील सुरु असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
आ. सत्यजीत तांबे यांनी जळगाव येथील प्रसिद्ध औद्योगिक कंपनी HD Fire Protect Pvt. Ltd. ला सदिच्छा भेट दिली. ही कंपनी अग्निसुरक्षा उपकरणांचे उत्पादन करणारी आघाडीची भारतीय संस्था असून तिच्या उत्पादनांची निर्यात 80 हून अधिक देशांमध्ये केली जाते. कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करताना त्यांनी स्थानिक युवकांसाठी रोजगार संधी, औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्यविकासावर विशेष भर दिला.
या दौऱ्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना आ. सत्यजीत तांबे म्हणाले, “जळगाव जिल्हा आणि इथली माणसं आमच्यासाठी नेहमीच खास राहिली आहेत. केवळ एक आमदार म्हणून नव्हे, तर या भागाशी जोडलेल्या एक नातवाच्या नात्याने मला इथल्या माणसांचा आत्मीय स्पर्श जाणवतो. आम्ही फक्त निवडणुकीपुरते नागरिकांमध्ये जात नाही, तर कायम त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
या संवादात्मक दौऱ्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांत सकारात्मकता आणि विश्वास निर्माण झाला असून, मतदारांनीही आ. तांबे यांच्या या थेट व आत्मीय संवादाचे मनापासून स्वागत केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ हा फार व्यापक आहे. ५ जिल्हे ५४ तालुके व ४ हजार हून अधिक गावांचा यात समावेश आहे. याच मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तांबे यांचा प्रयत्न सुरु असून टप्प्याटप्प्याने ते संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत आहेत.