महिला संरक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे ऍड.सचिन पाटील

महिला संरक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे ऍड.सचिन पाटील

चोपडा: आज दिनांक १७/०२/२०२३ रोजी कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथील महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण (प्रतिबंध मनाई निवारण) अधिनियम २०१३ या कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यशाळेचे” तसेच ‘साडी डे’ चे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी शिक्षणमंत्री कै.ना. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थापक अध्यक्ष कै.ना.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून चोपडा येथील विधिज्ञ ऍड.सचिन पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे व महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ.एम.टी. शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक टी. एस. पिंजारी यांनी केले. यात त्यांनी समितीचे महत्व व भूमिका काय याविषयी थोडक्यात मत व्यक्त केले.
यावेळी कार्यशाळेचे वक्ते अॅड.सचिन पाटील यांनी “अधिनियम २०१३” संदर्भात अतिशय विस्तृत अशी माहिती दिली म्हणजे या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे व त्याचा उगम कसा झाला, या कायद्यात कोणत्या १७ गाइडलाईन्स आहेत. हा कायदा फक्त स्रियांसाठीच नसून पुरुषांसाठी सुद्धा आहे हे स्पष्ट केले. अंतर्गत तक्रार निवारण समितीची कार्य प्रणाली, तिचे अधिकार या संदर्भात सखोल अशी माहिती दिली. तसेच काही उदाहरणे देऊन काही ठिकाणी कायद्याचा कसा वापर व गैरवापर केला जातो हे ही सांगितले. कायद्याचा गैरवापर करणाऱ्यास देखील शिक्षेची तरतूद आहे.नियमांना धरून कायदा करावा.स्त्रीला संरक्षण मिळावे या उद्देशाने कायद्याची तरतूद करण्यात आली आहे.लैंगिक शोषण रोखण्यासाठी स्थानिक समितीची स्थापना करावी.एक सामाजिक क्षेत्रातील एक महिला प्रतिनिधीची नेमणूक करावी. शक्ती कायद्याद्वारे महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यास मदत होते.महिला संरक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे ते आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. के. एन. सोनवणे आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘समाजात होणाऱ्या गुन्ह्यांमुळे भविष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला प्रतिबंध घातला जावा म्हणून कायद्यांची निर्मिती केली जाते. कायद्यांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनिता सांगोरे यांनी केले तर आभार विशाखा देसले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समिती सदस्य, महिला सहकारी व उज्वल मराठे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.