चोपडा महाविद्यालयात ‘एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील महिलांचे कार्यकर्तृत्व’ या विषयावर आधारित एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि.३१ मार्च, २०२३ (शुक्रवार) रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आलेले होते. या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांनी सदिच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन शिरपूर येथील एस.पी.डी.एम.महाविद्यालयातील डॉ.मनीषा जे.वर्मा यांच्या हस्ते संस्थेच्या संस्थापक व महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना. अक्कासो सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील, उदघाटक डॉ.मनीषा जे.वर्मा, बीजभाषक सेंधवा येथील शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयाचे डॉ.के.आर.शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, डॉ. संजय पवार, इतिहास अभ्यास मंडळ सदस्य डॉ. संजय बाबुराव सिंघाणे, इतिहास अभ्यास मंडळ सदस्य डॉ.सुनील भालेराव, सत्राध्यक्ष डॉ. संजय पाटील, माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डी.बी.पाटील, डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
या चर्चासत्रात देशभरातून ३०० हून अधिक संशोधक प्राध्यापकांनी नोंदणी केली होती तसेच १०० हून अधिक शोधनिबंध या चर्चासत्रासाठी प्राध्यापकांनी पाठविले होते.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक चर्चासत्राच्या आयोजक व इतिहास विभाग प्रमुख सौ. एस. बी. पाटील यांनी केले.
यावेळी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना प्रा.डॉ.मनीषा वर्मा म्हणाल्या की, ‘स्रियांच्या समस्या, प्रश्न यांची सोडवणूक करण्यासाठी स्त्री लिहू लागली व स्त्रीवादी चळवळ उदयास आली. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महिलांनी कार्याचा ठसा उमटविला आहे. इतिहासात स्रियांना स्थान मिळत नाही म्हणून महिलांच्या कार्यकर्तृत्वावर संशोधन व्हायला हवे.महिलांच्या कर्तृत्वाचा इतिहास लिहणे गरजेचे आहे. आज समाजात महिलांप्रती सन्मान निर्माण व्हावा याउद्देशाने लेखन व संशोधन व्हायला हवे’. यावेळी त्यांनी आयोजनाबद्दल कौतुक केले.
चर्चासत्राचे बीजभाषण करतांना डॉ.के.आर. शर्मा म्हणाले की, ‘स्रियांच्या परिवर्तनासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणाने स्रिया प्रत्येक क्षेत्रांत जोमाने भरीव कामगिरी करीत आहेत, त्यांचा इतिहास लिहिला पाहिजे’. या चर्चासत्राच्या आयोजनामधून देश-विदेशातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्रियांच्या इतिहासाविषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई पाटील म्हणाल्या की, ‘आदर्श समाजाची कल्पना महिलांशिवाय करता येतच नाही.शिक्षणामुळे सर्व स्तरातील सक्षमीकरण झाले आहे. आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधीत्व व सहभाग वाढविणे गरजेचे आहे.’
या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन चर्चासत्राचे समन्वयक डी.एस.पाटील यांनी केले तर आभार सौ. के. एस. क्षीरसागर यांनी मानले. याप्रसंगी बहुसंख्य संशोधक, प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात अध्यक्ष म्हणून डॉ. संजय पाटील हे उपस्थित होते. यावेळी इतिहास अभ्यास मंडळ सदस्य डॉ. सिंघाणे व्यासपीठावर उपस्थित होते. या सत्रात प्रा. दिलीप बी. गिर्हे, प्रा. सुनील पाटील, प्रा. एस. एम. बोरसे, प्रा. नितीन पाटील, प्रा. लीलाधर पाटील, प्रा. यशवंत शिरसाट आदींनी आपले शोधनिबंध सादर केले. डॉ. संजय पाटील यांनी याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात सत्राध्यक्ष म्हणून प्रा.सुनील पाटील हे तर मार्गदर्शक म्हणून प्रा. दिलीप गिर्हे हे उपस्थित होते. या सत्रात डॉ. विनोद सोनकुवर, डॉ. विलास पाटील, डी.पी.सपकाळे व दीनानाथ पाटील यांनी आपल्या शोधनिबंधांचे सादरीकरण केले.याप्रसंगी प्रा. दिलीप गिर्हे यांनी मार्गदर्शन केले. या दोन्ही सत्राचे सूत्रसंचालन व आभार डी.एस.पाटील यांनी मानले.
या ‘एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या’ समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिसभा सदस्य प्रा. सुरेखा पालवे व डॉ. मनिषा वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रा. सुरेखा पालवे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, ‘शिक्षणाने स्त्रीच्या प्रगतीची कवाडे खुली झाली. स्रियांना आर्थिक विनियोगात, आर्थिक नियोजनात सहभागी करून घेतले पाहिजे. आजच्या स्रियांनी आर्थिक नियोजनाबाबत सज्ञान व्हायला हवे. स्रियांनी कायदे व अधिकारांची माहिती करून घेतली पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद आजच्या स्त्रीमध्ये असायला हवी’.
यावेळी प्रा.भाग्यश्री जाधव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘शिक्षणामुळे स्रियांचा सर्वच क्षेत्रात वाढता सहभाग हे प्रगतीच्या दृष्टीने चांगली बाब आहे.स्रियांची सर्व क्षेत्रात प्रगती केल्यास देश प्रगतीपथावर जाईल’.
या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डी.एस.पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती सदस्य यांनी सहकार्य केले. याप्रसंगी बहुसंख्य संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.