मुलगाच ठरला आईचा कर्दनकाळ? मुलाकडून आईचा खून, मृतदेहासोबत घेतले कोंडून पोलीसांनी घराचा दरवाजा तोडून तरुणाच्या मुसक्या आवळल्या!
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर) नगर शहरातील सावेडी भागात गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर काॅलनीत राहणाऱ्या मुलानेच आईचा खून केल्याची घटना अमावस्येच्या दिवशी दुपारी घडली. बेबी सुधाकर गवारे (वय वर्षे ६०) राहणार कोपरगाव, हल्ली मुक्काम रा.नवलेनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. चाकू व अडकित्याच्या सहाय्याने आईचा खून केल्यानंतर मुलगा सुहास सुधाकर गवारे (वय ३०) याने स्वतःला देखील मृतदेहासोबत खोलीत कोंडून घेतले होते व तिथेच तो गोट्या खेळत होता. अहिल्या नगर पोलिसांनी दोन तास प्रयत्न केल्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सदर मुलाला ताब्यात घेतले.मयत बेबी सुधाकर गवारे या मुलांसोबत इंगळे नावाच्या गृहस्थांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गवारे यांच्या घरातून भांडणाचा मोठ मोठ्याने आवाज येत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना मुलानेच आईला जीवे ठार मारून स्वतःला घरात कोंडून घेतल्याचे दिसून आले.आणि तो मृतदेहा शेजारीच गोट्या खेळत असल्याचे दिसून आले.पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले होते.मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.घरातील
किरकोळ कारणा वरून जन्मदात्या आईला मारहाण करून भिंतीवर तीचे डोके आपटले होते व चाकू आणि अडकित्याच्या सहाय्याने आईचा खून केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे,पोलिस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मुलगा सुहास गवारे हा बेरोजगार युवक होता. तसेच तो मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याचेही सकृतदर्शनी निदर्शनास आले होते.असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीने दाखल झालेल्या पोलिसांनी खिडकीतून त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला होता.परंतू त्याने दरवाजाला आतून बेडशीट लावून दरवाजा बंद केला होता. पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याने दाराच्या फटीतून पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.अखेर एका कर्मचाऱ्याने मिरचीची भुकटी घेऊन ती पाण्यात मिसळली आणि त्या मुलाच्या अंगावर ते पाणी फेकले त्याच वेळी इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. सुमारे एकतास अथक परिश्रम केल्या नंतर तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. खुनाचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट झालेले दिसत नाही त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी करीत आहेत. ही आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.आजकाल मुलं होत नाही म्हणून लोक देवासाठी नवस सायास केले जातात आणि ज्यांना मुलं आहेत त्यांना आईवडील नकोसे झाले आहेत ही आजच्या समाजाची खरी शोकांतिका आहे. “आई सारखे दैवत दुसरे नाही” हे वाक्य फक्त शाळेच्या फळ्यावरच शोभून दिसते असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.

























