जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण

जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण
आतापर्यंत 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना दिली लस

जळगाव, दि. 2 – कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात लसीकरणाला वेग आला असून बुधवारी (1 सप्टेंबर) एकाच दिवशी तब्बल 77 हजार 513 नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले. जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसीच्या मात्रेनुसार आतापर्यंत 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पहिल्या लाटेनंतर आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण करण्यात येत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने जिल्ह्यात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाला दर तीन/चार दिवसानंतर लसीची पुरेशी मात्रा उपलब्ध होत आहे. त्यानुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर हजारो नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात लसीकरणास गती मिळाली असून ऑगस्ट महिन्यातच पावणे दोन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या लसीच्या मात्रेनुसार शहरी भागात 6 लाख 34 हजार 552 तर ग्रामीण पातळीवर 7 लाख 72 हजार 611 असे एकूण 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. विशेषत: शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात 1 लाख 38 हजारांहून अधिक संख्येने लसीकरण झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच उपाय असून जिल्ह्यात लसीचा पुरवठा नियमित याच प्रमाणात अखंड राहिल्यास लसीकरणाला गती मिळून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी म्हटले आहे.
*प्रतिदिन 1 लाख लसीकरणाचे प्रशासनाचे उद्दीष्ट*
सद्य:स्थितीत संसर्ग साखळी खंडीत झाली असून जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण देखील पूर्णपणे बरे झालेले आहेत. आगामी काळात संसर्ग वाढू नये अथवा संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध होत असून लसीच्या उपलब्धतेनुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर 1 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीचा पुरवठा याचप्रमाणे प्राप्त झाल्यास प्रतिदिन 1 लाख लसीकरणाचे प्रशासनाने उद्दीष्ट आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यांत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करु शकू असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.