चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
– (मान्यवरांच्या हस्ते झाला ८८ हून अधिक गुणवंतांचा सत्कार)
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयात दि.०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना. अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मा. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ.दीपक पाटील, चोपडा येथील मालती हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. आनंद राजाराम पाटील, उद्योजक श्री. संजय अग्रवाल, चोपडा येथील शासकीय कंत्राटदार अनिल कदम तसेच चोपडा येथील जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता विलास सुकलाल पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,
उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल,
उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे, कनिष्ठ विभागाचे समन्वयक श्री.पी.एस.पाडवी आणि वरिष्ठ विभागाचे पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख व्ही. पी.हौसे व कनिष्ठ विभागाचे पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख श्री.एस.टी.शिंदे तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले तर वार्षिक अहवाल वाचन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख विशाल पी.हौसे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या अहवालात महाविद्यालयात राबविल्या जाणारे विविध उपक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, केक-फ्री कॅम्पस, वाचन संस्कृती अभियान या उपक्रमांचा तसेच महाविद्यालयाच्या यशाच्या शिखरावरचा चढता आलेख आपल्या अहवाल स्वरूपात सादर केला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. दिपक ओंकार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचा परिसर व विद्यार्थी, प्राध्यापकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक महाविद्यालयात केले.यावेळी ते विद्यार्थ्यांना संदेश देतांना म्हणाले की, ‘अपयश ही आपल्या यशाची पहिली पायरी असून ज्यांना , पारितोषिक मिळाले नाही, त्यांनी महाविद्यालयात खचून न जाता आयुष्यात खूप काही करायचे आहे हीच आशा बाळगून भविष्याची वाटचाल करीत राहिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी निकोप व निरोगी स्पर्धा ठेवावी. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील १२ वी, पदवी, पदव्युत्तर विभागाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच विविध खेळ, क्रीडा, युवारंग, विविध क्षेत्रातील कलागुण, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी विभाग, सांस्कृतिक, आदर्श विद्यार्थी, वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी व संपूर्ण शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या ८८ हून अधिक विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘परीक्षा हे तंत्र आहे ते आत्मसात करण्यासाठी अभ्यास, जिद्द व चिकाटी हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेऊन मेहनत करावी व यशस्वी व्हावे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.डी.शिंदे यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख एस.टी.शिंदे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सदस्य यांनी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी बंधू -भगिनी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.