आदिवासी बालिकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास एकलव्य संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

आदिवासी बालिकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास एकलव्य संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पाचोरा(वार्ताहर) दि,९
१५ दिवसाचे बाळ उपचार करताना दगावले होते. मृत्यू झालेल्या बाळाच्या प्रेताची अवहेलना करुन विटंबना झाल्याचा आरोप पीडित भिल्ल कुटुंबाने करून १४ नोव्हेंबरला पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार पाचोरा पोलिसात दिली होती. परंतु, पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने एकलव्य संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी ८ डिसेंबर रोजी उपविभागीय
पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांना
पुनश्च निवेदन देवून कारवाईची मागणी केली असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करत अटक न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आदिवासी मृत बालिकेच्या आई- वडिलांनी १४
नोव्हेंबरला लेखी तक्रार दिली आहे. मात्र, या प्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल न केल्यामुळे १७ नोव्हेंबरला एकलव्य संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाला भेट देणारे आ. किशोर पाटील यांच्या समक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी १५ दिवसात चौकशी करुन संबंधित हॉस्पीटलच्या संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, त्यानंतरही आजपर्यंत संबंधितांवर कार्यवाही झालेली नाही. उलट डॉ. नीळकंठ पाटील यांनी पीडित भिल्ल कुटुंब अनिता मालचे यांच्यासह आदिवासी एकलव्य संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी मदत केली म्हणून त्यांच्यावर
फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, या हेतूने पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आदिवासी समाजाच्या मृत बालिकेच्या प्रेताची अहवहेलना व पीडित आदिवासी कुटुंबासह सुधाकर वाघ यांच्या विरोधात खोटी तक्रार
दिल्यामुळे डॉ. नीळकंठ पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी केली आहे. तर संबंधित डॉक्टर गुन्हा दाखल न केल्यास पोलीस उपविभागीय कार्यालयात एकलव्य संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा
देण्यात आला आहे. हे निवेदन पीडित कुटुंबाने पाचोरा पोलिसांना दिले आहे. तर तक्रार, धरणे आंदोलनाचे निवेदन आणि डॉ. नीळकंठ पाटील यांनी दिलेली लेखी तक्रार यात जोडलेली आहे.