चोपडा महाविद्यालयात ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात साजरा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र व मानसशास्त्र विभाग यांच्यातर्फे ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.एल. चौधरी यांच्या हस्ते माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना.अक्कासो.सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील म्हणाले की, ‘क्रांतिकारी स्त्रियांच्या उज्वल इतिहासाला व त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा, समाज सुधारक स्त्रियांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच त्यांच्या चरित्रातून प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे’.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, सौ.एम.टी.शिंदे, समन्वयक ए. एन. बोरसे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी भैरवी माळी हिने राजमाता जिजाऊ, दिव्यांनी पाटील हिने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, कावेरी शिरसाठ हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्रणाली तायडे हिने माजी शिक्षणमंत्री कै. मा.ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील, सारिका माळी हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई, दिव्या महाजन हिने ताराबाई शिंदे, हर्षदिव्या सोनवणे हिने आनंदीबाई जोशी, हर्षा पाटील हिने कवयित्री बहिणाबाई चौधरी, ख़ुशी साळुंखे हिने रमाबाई आंबेडकर, प्राचीता पाटील हिने सिंधुताई सपकाळ, हर्षदा पवार हिने इंदिरा गांधी, प्रतीक्षा पाटील हिने कल्पना चावला, कशिश मराठे हिने किरण बेदी इत्यादी भूमिका सादर करून विद्यार्थिनींनी समाज सुधारक व क्रांतिकारी स्त्रीयांच्या भूमिकेद्वारे त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला तसेच भावी पिढीला मोलाचा संदेश दिला.
याप्रसंगी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. क्रांती क्षीरसागर यांना “उत्तर महाराष्ट्र अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थीनीना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास” या विषयात पीएच.डी. पदवी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्त्री शक्तीचा जागर कार्यक्रमाचे औचित्य साधून एका स्त्रीच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी उदघाटक व महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए. वाघ म्हणाले की, ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊंनी बाल शिवबाला युद्ध कौशल्याचे धडे दिले त्याचप्रमाणे आजच्या स्त्रियांनी देखील समाजसुधारक आणि क्रांतिकारी स्त्रीयांच्या चरित्रातून बोध घेऊन आपल्या मुला-मुलींना आत्मनिर्भर बनविण्याचे सामर्थ्य जोपासले पाहिजे.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल. चौधरी म्हणाले की, ‘चरित्र वाचनातून महान विचारांचा परिचय होतो. तसेच समाज सुधारण्याची प्रेरणा मिळते. अडीअडचणींवर मात करून तेजस्वी जीवन जगण्याची कला समाज सुधारकांच्या चरित्रातून शिकायला मिळते. महान व्यक्तींच्या चरित्राचे वाचन करावे व त्यांच्या विचारांचे अनुकरण करून उत्तम जीवन जगावे’.यावेळी त्यांनी क्रांतिकारी व समाजसुधारक स्रियांच्या भूमिकेद्वारे कार्याचा परिचय करून देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माहेश्वरी धनगर हिने केले तर आभार प्रेरणा बडगुजर हिने मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. डी.पी.सपकाळे, डॉ. ए.बी.सुर्यवंशी, डॉ. डी. डी. कर्दपवार, सौ. एस. बी. पाटील, मुकेश बी.पाटील, संदीप देवरे, शाहीन पठाण, सौ. पूजा पुन्नासे, संदीप पाटील, मोतीराम पावरा, बी.एच.देवरे तसेच बहुसंख्य विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसमित्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.