कृषी उत्पन्नवाढीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर करावा-अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर

कृषी उत्पन्नवाढीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर करावा-अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर

जळगाव, दिनांक २१  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 1 एप्रिल ते 1 मे, 2023 या कालावधीत संपूर्ण राज्यात सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या लाभार्थ्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव डॉ. निलेश बारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील व सहायक लेखाधिकारी मनीषा पाटील उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी आपल्या मनोगतात शेती करतांना आधुनिक पद्धतीचा वापर करावा. एकच पिक न घेता बहुपिक पद्धतीने पिकांची लागवड करावी असे आवाहन केले. तसेच उपस्थित शेतकन्यांना मार्गदर्शन करतांना कृषी विभाग राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली.

डॉ. श्री. निलेश बारी, पशुधन विकास अधिकारी यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड आवश्यक असून पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेबाबत माहिती दिली.

योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी आपल्या प्रास्ताविकात समाज कल्याण विभाग राबवित असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची संकल्पना स्पष्ट केली व या योजनेमुळे लाभार्थ्यांना उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध झाल्याचे नमूद केले. तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी तर आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले.

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे सहायक आयुक्त श्री.पाटील यांनी सांगितले.