कृषि मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांचा स्मृतीदिन १६ जून हा दिवस केळी उत्पादक शेतकरी दिवस म्हणून जाहीर करण्याची मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली

कृषि मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांचा स्मृतीदिन १६ जून हा दिवस जळगाव जिल्ह्यात “केळी उत्पादक शेतकरी दिवस”(Banana Growing Farmers Day) म्हणून साजरा करा

जिल्हा प्रशासनाकडे खासदार उन्मेश दादा पाटील यांची मागणी

जळगाव — जिल्ह्याची ओळख ही केळी उत्पादक जिल्हा म्हणून आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, मागण्या बाबत वेळोवेळी शासन दरबारी मांडण्याचं काम शेतकरी नेते व माजी खासदार कृषी मिञ स्व. हरिभाऊ जावळे यांनी केले आहे. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न कशा प्रकारे मिळेल याबाबत ते प्रयत्न करीत राहिले. कृषि मित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचा स्मृतीदिवस १६ जून रोजी असून या दिवशी कृषि मित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्मरण व्हावे व केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळावे. यासाठी *हा दिवस जळगाव जिल्ह्यात “केळी उत्पादक शेतकरी दिवस” म्हणून साजरा करणे बाबत विचार व्हावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी म्हटले आहे की या दिवशी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, कृषि विभागाचे, विद्यापीठाचे, संशोधन केंद्राचे अधिकारी, केळी पिकातील शास्त्रज्ञ व तज्ञ, केळी निर्यातदार यांचे संयुक्तिक संमेलन आयोजित करण्यात यावे जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनात कृषि मित्र स्व. हरिभाऊनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.