पाचोरा सर्वत्र हवशी ट्रेंडच्या काळोखात,एक ‘आदर्श’ प्रकाश
संपूर्ण महाराष्ट्रात लग्न,हुंडा,विवाहितेला आर्थिक मागणीमुळे छळ,कर्मकांड रूढी परंपरेत अडकून घरातील नवीन मुलीवर अनाठायी परंपरेच्या नावाने मनुवादी साखळदंड अश्या बातम्या ऐकू येत असतांनाच.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एक चांगली बातमी कानी पडते आणि समाजात ऊर्जा देऊन जाते.
“उच्चशिक्षित तरुण तरूणीचा आदर्श असा शिवविवाह”
पुरोगामी विचारांचा पगडा असलेला तरुण अभियंता वर तेजस मंगेश पाटील (देवरे) रा.बोरणार ह.मु. पाचोरा आणि वधू M.Sc B.ed झालेली प्राध्यापिका तरुणी प्रियंका पद्माकर चौधरी (भदाणे) रा.कळमसरा ता.पाचोरा. लग्न कार्यात अनाठायी गरज नसलेले खर्च टाळून व इवेंट न करता सुद्धा साधा सरळ पारिवारिक सोहळा करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. महात्मा ज्योतिबा फुले सवित्रिमाई फुले यांच्या सत्यशोधक विवाहपद्धती प्रमाणेच मराठा सेवा संघाने सांगितलेल्या शिवधर्मानुसार शिव विवाह संपन्न झाला. यात विशेष म्हणजे कुठलाच प्रकारचा हुंडा नको ही अट ठेवली जाते ती मुलाकडून.आणि आदर्श विवाह असल्याचे मुख्य कारण मुलीचा आधी घटस्फोट झालेला असतांना पण त्यात “तिचा काय दोष ?” असे ठाम भूमिका घेऊन फक्त एकमेकांच्या परिवाराच्या पसंतीमुळे आणि मुलामुलीच्या वैचारिक समजदारीतून हा नवीन सुखी संसार सुरू होतोय हे प्रेरणादायी.
समाजात आधीच दूतर्फी हुंडा पद्धत सुरू आहे. अर्थात मुलाकडून प्रचंड आर्थिक मागणी म्हणजे हुंडा, पॅकेजच्या नुसार सोन,रिसॉर्ट मध्ये लग्न,महागडे कपडे ज्यांचा नंतर वापर सुद्धा होत नाही पण इन्स्टाग्रामवर ट्रेंड पाहून घेतले जातात अश्या प्रकारे हुंडा वाढत जातोय. तर मुलीकडून अप्रत्यक्ष हुंडा पद्धत म्हणजे भरमसाट अपेक्षा.जसे की शेतकरी नकोच,सरकारी नौकरी हवी त्यात शिपाई पण चालेल मग वाटेल तितके हुंडा देऊ लागल्यास शेती गहाण ठेऊ,मुलगा कंपनीत असला तर सात आकडी पॅकेज हवे,पुण्यात किव्हा मुंबई मध्ये स्वतःचा कोटींचा फ्लॅट हवा,गावाला घर-शेती पाहिजे पण मुलगी शेतात जाणार नाही.असे नवीन हुंडा पद्धती पडत चालली असतांना ह्या कुठल्याही आमिशांना व लोभांना न फसता ह्या तरुण तरुणींचा हा विवाह म्हणावा तितका आदर्श वाटतो. फक्त मन आणि विचार जुळले पाहिजे कर्तृत्ववान मुलगा शून्यातुन विश्व निर्माण करेल आणि कर्तुत्वहीन आहे ते विकून खाईल हा सकारात्मक दृष्टीकोन समाजात या दोघांनी पेरला.
या निमित्ताने समाजावर जबाबदारी पडते ती ह्या ट्रेंडी युवकांना आळा कोण घालेल ? सकाळी वैदिक पद्धत संध्याकाळी नाचत फिल्मी स्टाईल झगमगाट त्यात क्षणिक सुखा साठी लाखोंचा चुराडा. एका दिवसात दोन वेळा मुली वर अक्षदा पडणे मुळात धार्मिक आहे का ? साखरपुडा,संगीत,मेहेंदी,हळद,लग्न हे सर्व कमी वेळेत न आटोपता दिवसेंदिवस वाढत चालले आहे कारण फक्त श्रीमंतांचे अनुकरण त्यातूनच निर्माण होते ही हुंडा बळीतून जीव गमवायची वेळ.
मुलगी ही आपली सुख दुःखाची साथीदार आहे परंपरेतून मिळालेली शोभेची किव्हा उपभोगाची वस्तू नव्हे जी लग्नानंतर मात्र फक्त वेगवेगळ्या बंधनात अडकवून ठेवली जाते.
मुलांनो आणि मुलींनो लग्न करणे म्हणजे एकमेकांना स्वीकार करणे बस.लग्न हा पारिवारिक सोहळा असला पाहिजे आणि सामाजिक जबाबदारी पण आपण दिखावा साठी सामाजिक सोहळा करत जातोय. हे थांबेल कसे ? दोन जीवांचे मन जुळणे महत्वाचे. त्यात जात, पात, धर्म, राहणीमान, गरीबी श्रीमंती, जन्म कुंडली हा प्रश्न येतो कुठे ? मुलीला जर दिलेल्या परिवारात सुख नसेल तर दिल्या घरी सुखी रहा म्हणायचं कसं ? या पेक्षा ठाम भूमिका आई बापाने घेऊन तिला घटस्फोट घेऊ दिले पाहिजे. तिच्या पायावर उभे होऊ दिले पाहिजे आणि समाजाने ह्या मुलींना आपल्या लेकी प्रमाणेच आनंदाने स्वीकार केला पाहिजे. तेव्हा कुठे आपण समाज म्हणून प्रगती करत आहोत असे म्हणता येईल.
लग्न म्हणजे “भातुकलीचा खेळ नाही फार मोठी जबाबदारी आहे.” हे आधी आपण मुला मुलींना समजवण्यात कमी पडलोय. यातूनच त्यांच्या फालतू,बालिश वादातून लहान लहान कारणांमुळे होणारे घटस्फोट वाढत चालले ज्यामुळे दुसऱ्या जिवा सोबतच पूर्ण परिवाराला मानसिक झळ बसते हे ते विसरतात. विवाह संस्था टिकवायची असेल तर असे निर्णय आणि चर्चेतून बदल झालेच पाहिजे.