जवानांच्या शिक्षणात अडथळा नको – आ. सत्यजीत तांबे
– परीक्षा देण्यासाठी विशेष संधी देण्याची केली मागणी
प्रतिनिधी,
भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये यासाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU) प्रशासनाकडे पाठवलेल्या पत्राद्वारे त्यांनी या जवानांना परीक्षा देताना विशेष सवलती देण्याची विनंती केली आहे.
सध्या अनेक जवान YCMOU मार्फत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. हे विद्यार्थी देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असून त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी मुक्त विद्यापीठ हे एकमात्र योग्य पर्याय आहे. मात्र त्यांच्या सेवा स्वरूपामुळे नियुक्त्या, बदल्या आणि दूरवर असलेली कर्तव्यस्थळे यामुळेत्यांना वेळेत परीक्षा देणे कठीण होते. परिणामी, ते शिक्षण पूर्ण करण्यात अडथळ्यांना सामोरे जातात.
सद्याच्या घडामोडी पाहता भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. परिणामी, विद्यापीठाच्या नियोजित परीक्षांमध्ये सहभागी होणे त्यांना शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा या जवानांना पुढील सुट्ट्या मंजूर होतील, त्यावेळी त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा देण्याची विशेष संधी विद्यापीठाने उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही आ. तांबे यांनी केली आहे.
आ. तांबे यांनी विद्यापीठास पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, सैन्यातील जवानांनी घेतलेल्या शिक्षणाचा लाभ प्रत्यक्षात मिळावा यासाठी त्यांच्या परीक्षा नियोजनात लवचिकता दाखवावी. विशेषतः, जवानांनी जर पूर्वसूचनेनुसार परवानगी मागितली तर त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर किंवा शक्यतो त्यांच्या सेवा स्थळी परीक्षा देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
“शिक्षण हे सर्वांसाठी” या तत्त्वाचे पालन करत विद्यापीठाने या जवानांसाठी विशेष धोरण तयार करावे, अशी अपेक्षा त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. यासंदर्भातील निर्णय विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा, अशीही मागणी केली आहे.
ही मागणी पूर्णत्वास गेल्यास, हजारो सैन्य दलातील जवानांना त्यांच्या सेवेच्या काळातच शिक्षण पूर्ण करण्याचा मार्ग सुकर होईल. शिक्षण आणि सेवेचा समतोल राखता येईल आणि देशासाठी झटणाऱ्या या वीर जवानांना एक सकारात्मक सामाजिक संदेश दिला जाईल.
“देशासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या जवानांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे, हे प्रेरणादायी आहे. मात्र, त्यांच्या सेवेमुळे त्यांना नियमित परीक्षा देता येत नाही, ज्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. ‘शिक्षण हे सर्वांसाठी’ या तत्त्वाचा आदर ठेवून विद्यापीठाने विशेष धोरण आखावे, ही अपेक्षा आहे.”
— आ. सत्यजीत तांबे