Home महाराष्ट्र अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त! खासदार डॉ. कल्याण काळे यांचा दौरा, मदतीसाठी तत्काळ पंचनाम्याचे...

अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त! खासदार डॉ. कल्याण काळे यांचा दौरा, मदतीसाठी तत्काळ पंचनाम्याचे आदेश

अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त! खासदार डॉ. कल्याण काळे यांचा दौरा, मदतीसाठी तत्काळ पंचनाम्याचे आदेश

 

 

 

दत्तात्रय काटोले

 

सोयगाव, ता. २१ (प्रतिनिधी):

सोयगाव तालुक्यात अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांपुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शनिवारी तालुक्यातील बाधित गावांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकल्या आणि परिस्थितीची पाहणी केली.

 

खासदार काळे यांनी सोयगाव, आमखेडा, गलवाडा, वेताळवाडी, जंगला तांडा, फरदपूर तांडा, वरखेड तांडा, पळासखेडा, धनवट, फरदापूर, सावरखेडा, दानापूर, लेनापूर या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक शेतांमध्ये उभ्या पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शेतमालाचे नुकसान आणि घरांचेही नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.

 

“शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची जाणीव शासनाने गांभीर्याने घ्यावी. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असे खासदार डॉ. काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

त्यांनी तालुक्यातील तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन विभागाशी तात्काळ संपर्क साधून पंचनाम्यांचे आदेश दिले असून, मदतीस कोणताही विलंब होऊ नये, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

 

शेतकऱ्यांनी या दौऱ्यात पीक विमा, जनावरांचा चारा, शेतातील साठवणूक केलेला माल, घरांचे नुकसान अशा अनेक बाबी खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. “शासनाने फक्त पंचनाम्यापुरते न थांबता, तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी,” अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

 

डॉ. काळे यांनी या मागण्या गांभीर्याने घेत “शासनाच्या संबंधित विभागांशी त्वरित पत्रव्यवहार करून मदतीची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावली जाईल,” असे सांगितले.

 

मुख्य मुद्दे:

 

अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान

 

शेतमाल, जनावरांचा चारा आणि घरांचे नुकसान

 

खासदार डॉ. काळे यांचा दौरा आणि तातडीच्या पंचनाम्याचे आदेश

 

शेतकऱ्यांकडून शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी

 

कोट. आजपर्यंत आमच्या गावामध्ये एकही खासदार आला नाही आम्हाला आज डॉक्टर कल्याणराव काळे आमच्या गावांमध्ये आले आम्हाला असे वाटले की भगवंताचे रूपाने आमच्या गावांमध्ये आले आणि विशेष म्हणजे रात्रीला साडेआठ वाजता कोणता खासदार दौरा करून इतक्या खराब रस्त्याने आमच्या गावाला येतो हे आम्हाला एक आश्चर्य वाटते.

 

 

 

 

 

 

Show quoted text

Don`t copy text!