‘वकील संरक्षण कायदा’ त्वरित लागू करावा! – वकिलांच्या मागणीला आ. सत्यजीत ताबेंचा पाठिंबा

‘वकील संरक्षण कायदा’ त्वरित लागू करावा!
– वकिलांच्या मागणीला आ. सत्यजीत ताबेंचा पाठिंबा
– अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा पारित करावा

प्रतिनिधी, अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ॲड. आढाव दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ व वकील संरक्षण कायदा त्वरित लागू व्हावा, या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा वकिलांच्यावतीने जिल्हा न्यायालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात आमदार सत्यजीत तांबे सहभागी होत वकिलांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. आ. तांबेंनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी ‘वकील संरक्षण कायदा’ त्वरित लागू करावा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबेंनी केली.

दुहेरी हत्याकांडानंतर वकिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. न्यायालय हे लोकशाहीचा एक स्तंभ आहे. त्यामुळे वकिलांच्या स्वरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे. राज्यस्थान व बिहार यांसारख्या राज्यात ‘वकील संरक्षण कायदा’ लागू झाला आहे. महाराष्ट्रात देखील ह्या कायदाचा आराखडा तयार आहे. ‘वकील संरक्षण कायदा’ ही जबाबदारी विधी व न्याय विभागाची आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे कायद्यात रुपांतर करावे, असे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.

आ. सत्यजीत तांबेंनी यापूर्वी देखील दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. राज्यातील वकिलांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाचा प्रलंबित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेल्फेअर ॲक्ट येत्या अधिवेशनात पारित करुन त्याची तातडीने अमलबजावणी करावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
…………………………………………