शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये – कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय
पेरणी करू नये – कृषी विभागाचे आवाहन

पुणे, दि. 2 – कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात 2 जून ते 4 जून, 2021 या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तर 5 जून, 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग, पुणे यांनी वर्तवली आहे.
सोयाबीन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000