विद्यापीठात कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा उभारण्यात येईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यापीठात कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा उभारण्यात येईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

जी-२० युवा संवाद – भारत @२०४७ संमेलना’चे उद्घाटन

*जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका) -* कवयित्री बहिणाबाई चौधरी पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन मधून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच पुतळाही उभारण्यात येणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. जी-२० संमेलनाच्या रूपाने तरूणांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशाला शिखरावर पोहचविण्याचे काम तरूणच करू शकतात. अशी आशा ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित ‘जी-२० युवा संवाद – भारत @२०४७ संमेलना’चे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक डी‌. कार्तिगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे , जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखाडे , नितीन झाल्टे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तरूणांनी प्रगती करण्यासाठी शिस्त अंगिकारण्याची‌ गरज आहे. आजचा तरूण सोशल मिडियात अडकला आहे‌. भारतातील तरूणाची आता जगाला कौशल्य रूपी मनुष्यबळाच्या रूपाने गरज आहे.

आज तरूणांमध्ये प्रतिभा आहे. तरूणांना दिलेले उद्दिष्ट तरूण निश्चित पूर्ण करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षणाकरिता आज भरपूर निधी दिला जात आहे. तरूण देशाचे भवितव्य आहे. तरूणांनी संधीचे सोने करावे. असे ही पाटील यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री.महाजन म्हणाले की, भारत तरूणांचा देश आहे. जगाला कौशल्ययुक्त तरुणांची गरज आहे. ही गरज भारताचे तरूण पूर्ण करू शकतात. यासाठी तरूणांनी कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. गाव सोडण्याचे धाडस केले पाहिजे. तरूणांनी कामात प्रामाणिकपणाना अंगिकारला पाहिजे. मनामध्ये जिद्द ठेवून काम केले पाहिजे‌. संकटाला न घाबरता धाडस करून तरूणांनी काम केले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळात तरूणांच्या शैक्षणिक व सर्वांगिण हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तरूण देशाचे भविष्य आहे. तरूणांनी स्वत:ला ओळखावे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे. अशी अपेक्षाही श्री.महाजन यांनी यावेळी व्यक्त केली‌.

कुलगुरू श्री‌ माहेश्वरी यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करावे. युवकांमधील उर्जेचा वापर करण्याचे आपल्यापुढे आवाहन आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे करत आहे.

तासिका नियमित करा, कॉपी न करता परीक्षा द्या. जीवनात शिस्तपणा असला पाहिजे. चांगल्या मित्रांचा गोतावळा तयार करा, प्रमाणिकपणा जपा, ज्ञान, कौशल्य व प्रतिभेचा वापर करून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम तरूणांनी करावे. अशा शब्दात कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राजेश पांडे यांनी बीज भाषण केले. श्री.पांडे म्हणाले की, २०४७ पर्यंत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश भारत असणार आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करायचे आहे. भारताची युवाशक्ती आपल्या कौशल्यावर जगाचं नेतृत्व करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात युवकांचे कौशल्य व कल्पनाशक्तीला वाव देणारा अभ्यासक्रम असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्याहून महाराष्ट्रातील ५ लाख तरूणांशी संवाद साधणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील अडीच लाख तरूणांपर्यंत विकसित भारताचा संकल्प पोहोचला पाहिजे. अशी अपेक्षा श्री.पांडे यांनी यावेळी व्यक्त केली.

भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनपूर्वी विद्यापीठ आवारात तिरंगा रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिलेल्या अमृत काळातील पंचप्रण संकल्पनेवर हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांनीही युवकांशी संवाद साधला.