भरकटलेल्या भावी पिढीसाठी किर्तनातून व्यसनमुक्तीचा शपथविधी,ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांचा राज्यातील पहिला उपक्रम
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आजची तरुण पिढी ही भौतिक सुख आणि व्यसनाधीनतेकडे झुकत चालली आहे.त्या भरकटलेल्या भावी तरूण पिढीला सत्मार्गावर आणून गावाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील डोंगर वाडीच्या श्रीराम संस्थानचे प्रमुख आणि तारकेश्वर गडाचे महंत वैकुंठवासी नारायण महाराज यांचे पट्टशिष्य ह.भ.प.लक्ष्मण महाराज कराड यांनी एक नामी युक्ती शोधून काढली आहे.गावात किर्तनाला गेले की त्या गावातील तरुणांना एकत्र करून त्यांच्या कडून व्यसनमुक्तीची शपथ वदवून घ्यायची आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांच्याच हातात रिमोट कंट्रोल ठेउन गावातील सप्ताहाची सुत्रे नविन तरुण पिढीच्या हातात द्यायची. हा पहिला उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथील अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने काल्याच्या किर्तनात राबवला गेला आहे. हनुमान टाकळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि कोपरे गावच्या सरपंच सौ छायाताई भाऊसाहेब उघडे यांचे पती भाऊसाहेब उघडे यांच्या गळ्यात प्रथम ह.भ.प. कराड महाराज यांच्या हस्ते तुळशीची माळ घालण्यात आली. आणि पुढील रौप्य महोत्सवी वर्षातील काल्याच्या महाप्रसादाची पंगत गावातील सर्व कुटुंबातील नवं तरुणांच्या हातात दिली आहे.हा आगळावेगळा उपक्रम राबवून संपूर्ण राज्यभरातील जास्तीत जास्त नवतरूणांना व्यसनापासून जोमाने दुर करण्यासाठी कराड महाराज यांनी किर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.एकेकाळी पुण्यातील रजनिश आश्रमाचे सुप्रसिद्ध धर्म गुरू आचार्य रजनीश यांनी “भोगातून समाधिकडे” हा संदेश जगाला देऊन समाधी घेतली होती.तसेच आजचे सुप्रसिद्ध किर्तन कार ह.भ.प.लक्ष्मण महाराज कराड यांनी व्यसनापासुन दूर राहण्याचा हा उपक्रम राबवून जगाला व्यसनमुक्तीचा एक वेगळाच संदेश दिला आहे. कोपरे गावातील अनेक घरातील तरुण या उपक्रमात सहभागी झाले आहेत.मौजे कोपरे येथे रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त हनुमान मंदीरात दिनांक 5 ते 12 एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहात सर्व ह.भ.प.रविंद्र महाराज मदने, संजय महाराज वारे, वैष्णवी महाराज वाघमोडे,अभिमन्यू महाराज भालसिंग, महेश महाराज आव्हाड,ऋतुजाताई कासार,सुदर्शन महाराज उदासीन, शेवगावचे संजय महाराज बिलावत यांची किर्तने झाली.ह.भ.प.दतात्रय महाराज राजळे यांनी व्यासपीठावर ज्ञानेश्वरी वाचन केले.वाचन केलेल्या ग्रंथाची गावातून सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती.वरील काळात उघडे, वाघमोडे,ढाकणे, आव्हाड,माने, खरात,दिंडे,खेडकर या परीवाराच्या वतीने दररोज सकाळ संध्याकाळ पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी चार वाजता प्रवचन, सायंकाळी हरीपाठ आणि रात्री सात ते नऊ हरीकिर्तन अशा प्रकारे या सोहळ्याची रुपरेषा ठरवण्यात आली होती.संपुर्ण पंचक्रोशीतील गावात या सोहळ्याची चर्चा सुरू होती.चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर गावातील तरुणांनी पैठण येथुन कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने भल्या पहाटे हनुमान मुर्तीला जलाभिषेक करण्यात आला.आणि काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.पंचक्रोषीतील अनेक भाविक भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते.गावातील मंदिरावर आकर्षक वीद्युत रोषणाई करून या सप्ताहातील पंच कमेटीच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते.