कर्जाणे येथे ”जळगाव जिल्हास्तरीय साहस कार्यशाळा’ उत्साहात संपन्न”जीवनात यशस्वी होण्यासाठी साहस महत्वाचे’-डॉ. संजय पाटील यांचे मत

कर्जाणे येथे ”जळगाव जिल्हास्तरीय साहस कार्यशाळा’ उत्साहात संपन्न”जीवनात यशस्वी होण्यासाठी साहस महत्वाचे’-डॉ. संजय पाटील यांचे मत

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती शरश्चंद्रिका सुरेश जी. पाटील आश्रमशाळा, कर्जाणे येथे दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ‘जळगाव जिल्हास्तरीय साहस कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळा उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल हे उपस्थित होते. या प्रसंगी कार्यशाळेचे उदघाटक म्हणून वैजापूर वनक्षेत्राचे वनपाल श्री.आय.के.शेख, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. संजय पाटील, प्रमुख अतिथी म्हणून वनपाल श्री.आय.एस.तडवी, वनपाल श्रीमती अर्चना गवते, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगिनी बाविस्कर, मुख्याध्यापक श्री. जितेंद्र पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सौ. पी. एम. रावतोळे, डॉ. सौ.के. एस. क्षिरसागर, सहा. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. आर. पाटील, डॉ. पी. एन. सौदागर, श्री. एम. बी. पावरा आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळा समन्वयक व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी डी.कर्दपवार यांनी प्रास्ताविक केले. सदर कार्यशाळेप्रसंगी जळगाव जिल्हा परिक्षेत्रातील एकूण ११४ विद्यार्थी सहभागी झाले होते.

जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी ‘साहस शिबिराचे महत्त्व’ या विषयी मार्गदर्शन केले.

तसेच डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी ‘साहस शिबिराची आवश्यकता व शिबीरातील विद्यार्थ्यांची भूमिका’ यावर विचार मांडले.

याप्रसंगी जितेंद्र पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना परिसराविषयीची माहिती दिली.

तर वनपाल श्री. के. वाय. शेख यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना ‘सातपुड्याला वन वैभवाने संपन्न करण्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.’ असे आवाहन केले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल यांनी ‘साहस कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

या कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. आर. आर. पाटील यांनी केले तर आभार डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यांनी मानले.

या तीन दिवसीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी अनेर नदी परिभ्रमण, प्रबोधन पर व्याख्यान, साहसी खेळाचे प्रात्यक्षिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी योगा व प्राणायाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सातपुडा जंगल परिभ्रमणासाठी विद्यार्थ्यांना नेण्यात आले. याप्रसंगी वनरक्षक विजय शिरसाठ व इतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी त्यांनी सातपुड्यातील विविध वनस्पती व प्राण्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी जंगलामध्ये दोरीच्या साहाय्याने विविध साहस कार्य करून दाखविले. याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. दुपारच्या सत्रात वनरक्षक श्री.विजय शिरसाठ व श्री. समीर तडवी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी विद्यार्थ्यांनी कर्जाणे या गावात ग्रामीण जीवन सर्वेक्षण करून विस्तृत विश्लेषणात्मक माहितीचे संकलन केले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तिसऱ्या दिवशी योगा व प्राणायाम झाल्यानंतर सातपुडा जंगल परिभ्रमणासाठी अनेर नदीच्या दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेश राज्यातील धवली गाव परिसरात विद्यार्थ्यांना नेण्यात आले. दुपारच्या सत्रात समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगिनी बाविस्कर, मुख्याध्यापक श्री. जितेंद्र पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी तीन दिवसातील विविध कार्यक्रमांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केलेल्या साहस कार्यांच्या माहितीचा आढावा प्रास्ताविकातून प्रस्तुत केला.

त्यानंतर डॉ. ए. बी. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे अनुभव जीवनाच्या प्रत्येक वाटेवर मार्गदर्शक ठरतील, असा मार्गदर्शनपर सल्ला दिला.

यावेळी अध्यक्षीय मनोगतातून प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी ‘व्यक्तिमत्व विकासामध्ये साहस आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी जीवनाच्या प्रत्येक वाटेवर साहसीवृत्ती जोपासावी’ असे मत व्यक्त केले.

समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. आर. पाटील यांनी केले तर आभार डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यांनी मानले.

सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम. बी. पाटील, श्री. एस. जी. पाटील, श्री. कल्पेश पाटील व सहभागी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, मच्छिंद्र पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी अभिनंदन केले.