बावनकुळेंनी विधानसभेत आवाज उठवताच शनैश्वर देवस्थानच्या मुख्याधिकाऱ्याला धर्मदाय उपायुक्तांचे चौकशीसाठी प्रेमपत्र
(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानच्या स्वच्छ कारभाराचे चांगलेच वाभाडे हिवाळी अधिवेशनात काढले होते. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत बोगस नोकर भरती, देवस्थान चौथरा दर्शन पावती, लाईट असताना विनाकारण दाखवलेला जनरेटरचा डिझेल खर्च इत्यादी आरोपा बाबद हिवाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ केला होता.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शनैश्वर देवस्थानच्या कारभाराची लवकरात लवकर कसून चौकशी करून योग्य रीतीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता होत असताना दिसत आहे.अहमनगर जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील धर्मदाय उपायुक्तांचे शनैश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष केरू दरंदले यांना दिनांक सात फेब्रुवारीला चौकशीसाठी न्यासाच्या कार्यालयात हजर राहण्यासाठीचे प्रेमपत्र देण्यात आले आहे. सोनई येथील युवानेते ऋषिकेश शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनैश्वर देवस्थानच्या गैरकारभाराची चांगली चौकशी करावी म्हणून देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिदर्शन घेतले त्याच दिवशी उपोषण केले होते. त्या उपोषणाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट दिली होती आणि थेट विधानसभेत आवाज उठवला होता.त्याची कार्यवाही जलदगतीने होताना दिसत आहे.शनैश्वर देवस्थानचा स्वच्छ कारभाराच साडेसातीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे.युवा नेते ऋषिकेश शेटे यांना शासनामार्फत एका मशिनगण धारी सुरक्षा रक्षकाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.धर्मदाय उपायुक्तांनी दिलेल्या प्रेम पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना क्र.४५३ च्या कार्यवाही बाबद पत्रात सही करणार हे न्यासाच्या कार्यालयात चौकशी कामी सात फेब्रुवारीला येणार आहेत तरी न्यासाच्या सर्व विश्वस्तांनी न्यासाच्या कार्यालयात लेखी जबाब व चौकशी कामी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशी अहवाला नंतर सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. देवस्थानचा निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून काहीजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत.शनैश्वर देवस्थानच्या चौकशी फेऱ्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
























