अर्ज एक, योजना अनेक उपक्रमातंर्गत शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज एक, योजना अनेक उपक्रमातंर्गत
शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 15 – कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकत्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

या प्रणालीव्दारे कृषि यांत्रिकीकरण उपभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या (ट्रॅक्टर व औजारे/बियाणे/हरितगृह/शेडनेट/कांदाचाळ इ) निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल संगणक/लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर सकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जावून त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमां‍क महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी पूर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
महा-डीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला नसेल त्यांनी आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले आहे.